Monday, March 25, 2013

पुन्हा होळी

उद्या होळी म्हणजे वाईट चालीरीती, वाईट कृत्य यांची होळी. पण हल्ली मला प्रश्न पडतो खरच होळी म्हणजे वाईटाची होळी कि निसर्गाच्या अद्वितीय संपत्तीची होळी. उद्या आता प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होणार. आधीच दुष्काळानं पोखरून टाकलेल्या ह्या महाराष्ट्र देशाला हे असं वृक्ष तोड किती परवडणारी आहे ह्याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. आज दुष्काळामुळे जी परिस्थिती ओढावली आहे त्या करता कोण जबाबदार ह्या विषयावर चर्चा वाद विवाद करण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीवर तोडगा काढुन भविष्यात पुन्हा हि परिस्थिती उद्भवणार नाहि ह्या करता विचार केला पाहिजे. आपण नुसतंच तोंडानं म्हणतो झाडे जगवा, झाडे वाचवा पण प्रत्यक्षात आपण ह्यातल काहिच आमलांत आणत नाहि.

जसा काळ बदलतो तशा रुढि, परंपरा पण बदलायला पाहिजेत. सध्याच्या काळात होळी साजरी करण्याकरता दुसरा काहि पर्याय आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे. आपल्या सभोवती अशा किती तरी गोष्टि सापडतील ज्याचा आपण होळीत जळणं म्हणुन उपयोग करू शकतो. चांगल्या डवरलेल्या झाडांच्या फांद्या तोडुन त्याची होळी करण हा नक्कीच योग्य पर्याय नाहि. आपण होळीची पूजा करतो म्हणजे एका अर्थानं त्याला देवच मानतो, मग ह्या दैवताला तरी मान्य असेल का कि त्यानेच निर्माण केलेल्या निसर्गाची आपण जाळुन राख करतो. वर्षभर आपण कितीतरी टाकाऊ माल जतन करू शकतो ज्याचा उपयोग आपण अशा प्रसंगांना जळणं म्हणुन करु शकतो. जेव्हा ह्या रुढि, हे सण अस्तित्वात आले किंवा सुरू झाले तेव्हाची परिस्थिती एकदम भिन्न होती. आपला देश निसर्ग संपन्न असा होता.

प्रत्येक गल्लीबोळात होळी पेटवण्या पेक्षा एक गाव एक गणपती ह्या तत्त्वावर एक गाव एक होळी केली तरी आपण मोठ्या प्रमाणावर होणारा हा निसर्गाचा ह्रास थांबवु शकु. गावाकडे अजुनहि चूल पेटवण्याकरता गोवर्‍यांचा वापर केला जातो. आपणही ह्या पर्यायाचा विचार करायला हरकत नाहि. रोज आपण मोठ्या प्रमाणात पुठ्ठे, मोठे मोठे बॉक्सेस, कागदाचे चिटोरे कचर्‍यात टाकुन देतो, पण हेच आपण जर एखाद्या सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवल तरी त्याचा जळणं म्हणुन उपयोग करता येईल. पर्याय पुष्कळ आहेत पण ते अंमलात आणण खूप महत्त्वाचे आहे.
चला एकत्र येऊन संकल्प करुया निसर्गाचा ह्रास थांबवूया.